काय निर्णय घ्यावेत? राष्ट्रवादीचे नेते जाणतात; धनंजय मुंडे यांच्यावरून काय म्हणाले संजय राऊत
![Shivsena Sanjay Raut says Dhananjay Munde issue is not affecting Mahavikasaghadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/sanjay-Raut-INTERVIEW.jpg)
राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी जोर धरला जात आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांचं राजकारण करु नये, शरद पवार यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. तसेच महाविकास आघाडी सरकारला या घटनेमुळे कोणताही धोका नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. त्याचसोबत शेतकरी कायदे मागे घेतले तर सरकारची प्रतिमा ही अधिक उजळेल, सरकारनं समन्वय दाखवावा आणि एक पाऊल शेतकऱ्यांसाठी मागे यावं, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं की, “धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्वही आहेत. सुजाण, प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावेत? काय नाही, याचा अनुभव सर्वाधिक कोणाला असेल तर तो राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे. याप्रकरणामुळे महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल, तर तो भ्रम आहे.”
“धनंजय मुंडे यांचा विषय हा पूर्णपणे कौटुंबिक आहे. राजकीय विषयामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही, पण कौटुंबिक विषयांमध्ये कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. जसं काल जयंत पाटलांनी सांगितलं की, राजकारणात शिखरावर जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एका क्षणात त्यावर चिखलफेक करुन आपण त्या संपूर्ण कुटुंबाच जीवन उद्धवस्थ करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसांत करु नये, हे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत. हे शरद पवार यांनीही आम्हाला सांगितलं आहे,” संजय राऊत म्हणाले