शेतकऱ्यांच्या नावाने तब्बल ८००० कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
![Uddhav Thackeray said that there is a scam of 8000 crores in the name of farmers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Uddhav-Thackeray-780x470.jpg)
मुंबई : हिंगोलीतील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले. सरकारने आपले अवयव विकत घेऊन कर्जमाफी करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. काल त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर पीक विमा योजनेच्या माध्यमातून तब्बल ८००० कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यावेळी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात नव्हते. मी बोलताना बोलून गेलो, स्वत:च्या राज्यातील शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त असताना दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्याची धुणीभांडी करायला जाणारी लोकं हे राज्यकारभार करायला नालायक आहे. तो शब्द त्यांना लागला. त्यावरुन त्यांना काय करायचं ते करावं. पण मी नागरिकांना विचारतो की, या शेतकऱ्यांवर अवयव विक्री करण्यापर्यंतची वेळ आली मग राज्यकारभार करणाऱ्यांना बोलायचं काय?
हेही वाचा – ‘देशातील कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ’; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
गेल्या दोन-तीन दिवसांत विनायक राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. सगळीकडे मोर्चे निघत आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारणा होतेय. मी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय, जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तिथे सर्वांनी कलेक्टर कार्यालयावर मोर्चे घेऊन जा, त्यांना विचारा, काल-परवाचे पंचनामे सोडा, त्याआधी झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे केले का? त्याची परतफेड कधी मिळेल? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे का? अशी शंका मला येऊ लागली आहे. कारण एक रुपयात पीक विमान मिळणार म्हणून पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरलाय. तसेच शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकारने पीक ८००० कोटी रुपये विम्याच्या बोडक्यावर घातले आहेत. एवढं करुन विमा कंपन्यांचे कार्यालय बंद आहेत. त्यांच्याकडे कोणी फोन घेत नाही, कुणी कुणाला दाद देत नाहीत. ते सरकारचं ऐकत नाही आणि शेतकऱ्यांना सामोरे जात नाहीत. त्यामुळे हा पैसा त्या कंपन्यांच्या नावाने कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घेतला पाहिजे. कारण हा पैसा करदात्यांचा पैसा आहे. शेतकऱ्यांना किती पैशांचे मदत मिळाले पाहिजेत आणि किती रुपयांचे चेक मिळत आहेत ते बघायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.