‘..त्यावेळी बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं’; उद्धव ठाकरेंनी करून दिली आठवण
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक किस्सा सांगत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मर्दाची औलाद असाल तर ईडी आणि सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या. राजकारणातले नामर्द तुम्ही..तुमचे दोन खासदार होते तेव्हा शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर बसवून हा महाराष्ट्र फिरवून दाखवला. हे भूत मानेवर बसवून सगलीकडे फिरवलं. परंतु आज तुम्ही आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात? हेच का तुमचं हिदुत्व? हिच तुमची नीतीमत्ता आणि हिच तुमची वृत्ती.
हेही वाचा – ATM ने व्यवहार करताय? पण तुम्हाला माहीत आहे का एका दिवसात किती रुपये काढता येतात?
मला एक गोष्ट कळत नाही. जे तुमच्या बरोबर राहिले, आम्ही २५ वर्षे तुमच्याबरोबर राहिलो, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. तुम्ही अगदी शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाहीतर अटल बिहारी वाजपेयी यांनी तुम्हाला तेव्हाच कचऱ्यात टाकलं होतं. हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एकमेव व्यक्ती होती, जी तुमच्या पाठिशी उभी होती. आत्ताच्या या पंतप्रधानांच्या पाठिशी हा एकमेव माणूस उभा राहिला. तेव्हा बाळासाहेब यांच्या पाठिशी नसते तर आज हे (नरेंद्र मोदी) जगातल्या सर्वोत्तम पंतप्रधानांच्या यादीत असते का? हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.