महाराष्ट्राने फक्त राम राम म्हणत घंटा वाजवायची का? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray | देशात पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते आपल्या राजकीय विरोधकांवर सडकून टीका करताना दिसतायत. शिवसेना (ठाकर गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशीवमध्ये बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातमध्ये नेली जात आहे. महाराष्ट्राने फक्त राम राम म्हणत घंटा वाजवायची का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरातला तुम्ही समृद्ध करा. आमची हरकत नाही. संपूर्ण देशातील प्रत्येक राज्य समृद्ध झाले पाहिजे, एवढी जाणीव आम्हाला आहे. पण आमच्याकडे येणारे उद्योग, असणारे उद्योग गुजरातले नेले जात आहेत. आमच्याकडे असलेले डायमंड मार्केट गुजरातला नेले, फिल्म फेअर अवॉर्ड गुजरातला आयोजित केला जातो. क्रिकेटचा अंतिम सामना हा गुजरातला आयोजित केला जातो. हे काय लावलंय.
हेही वाचा – भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार का? माधुरी दीक्षित म्हणाली..
महाराष्ट्राच्या हक्काचे दोन उद्योग गुजरातला नेले. यातला एक उद्योग महाराष्ट्राला दिला असता तर काही फरक पडला असता का. ८० हजार ते १ लाख नोकऱ्या या युद्योगांतून मिळणार आहेत. महाराष्ट्राने फक्त राम-राम करत घंटा वाजवायची का? आमचं हिंदुत्त्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्त्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
वेदांता फॉक्सकॉन हा उद्योग गुजरातला पाठवला होता. मात्र गुजरातमध्ये सुविधा नसल्यामुळे ती कंपनी देशाबाहेर निघून गेली. हा उद्योग महाराष्ट्रात येणार होता. पण हा उद्योग जबरदस्ती गुजरातला नेण्यात आला. पुढे हा उद्योग देशातून गेला. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं. देशाचं नुकसान झालं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.