मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का ?
कवठे येमाईतील मेळाव्यात आढळराव पाटलांची कोल्हेंवर टीका
शिरूर : “पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का?” अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाचार घेतला. गावगप्पा मारणार्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
कवठे येमाई येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पूर्वा दिलीप वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंगराव पांबूरकर, डॉ. सुभाष पोकळे, मारुतराव शेळके, सुदाम इंचके, अनिल शिंदे, बाळासाहेब बेडे, भगवान शेळके, बापूसाहेब शिंदे, प्रकाशराव पवार, सविताताई बगाटे आदी उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले की , आता ही देशाची निवडणूक आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या वेळी केलेली चूक परत करू नका. संसदेत कोणी किती प्रश्न मांडले याचा हिशोब त्यांनी सांगितला. ते म्हणाले की विद्यमान खासदाराने संसदेत ६२९ प्रश्न मांडले, मी ११०२ प्रश्न मांडले. याचा वेध घेण्याची हीच वेळ आहे. पोपटराव गावडे म्हणाले की,
विकासकामांसाठी विकासपुरुष आढळराव पाटील यांना निवडून आणावेच लागेल. विद्यमान खासदार आले आणि गायब झाले. मात्र आढळराव पाटील यांनी जमिनीशी असणारी नाळ केव्हाच तुटु दिली नाही. जमिनीशी नातं असणारा हा नेता आहे. मतदारसंघात भरघोस निधी त्यांनी आणला आहे.
डॉ. सुभाष पोकळे म्हणाले, कवठे येमाई गाव आणि आढळराव यांचे वेगळे नाते आहे. त्यांच्यासाठी आपण ठामपणे मागे आहोत. ज्यांना नियी असूनही वापरता आला नाही, त्यांचे हे काम नव्हे, त्यासाठी आढळराव पाटील यांना पर्याय नाही.
अभिजित बोराटे म्हणाले, सेटवरचा माणूस सेटवर पाठवायची हीच वेळ आहे. त्यांनी केवळ निधी आणण्याचे नाटक केले, म्हणून तर त्यांच्या काळातला ८० टक्के निधी परत गेला; मात्र अनुभवी अशा आढळराव यांनी दीड हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे त्यांच्यासाठी आपले मत महत्वपूर्ण आहे.