“चोर कधी स्वतःला….”; समीर वानखेंडेंनी आरोपांचे खंडन केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई |
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. त्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही असा निशाणा संजय राऊत यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर साधला आहे. “सुशातसिंह राजपूत प्रकरणापासून एक चित्र निर्माण केले आहे महाराष्ट्रात फक्त गांजा, अफू, चरस याचेंच पीक निघते. मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, मराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर बोट ठेवले आहे. गुजरातच्या बंदरावर २५ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले त्याची बातमी होत नाही. नवाब मलिक जे मांडत आहेत हे पाहिल्यावर स्पष्ट दिसते की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आले आहेत. बॉलीवूड कलाकाराकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?,” असे संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.
Witnes in #AryanKhan case made to sign on blank paper by NCB is shocking. Also thr r reports that thr ws demnd of huge money .CM UddhavThackeray said tht ths cases r made 2 defame Mah'shtra.Ths seems 2b comng tru @Dwalsepatil
Police shd tk suo moto cognizance@CMOMaharashtra pic.twitter.com/zipBcZiRSm— Sanjay Raut (@rautsanjay61) October 24, 2021
“याविषयी बोलताना भाजपाच्या लोकांना वाटते की ते आकाशातून पडले आहे. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी अशी मागणी होत आहे. पण हे केंद्रीय तपास यंत्रणांचे जे लोडणं आमच्या गळ्यात मारले आहे ते काढले पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्र पोलिसांचे खाते ड्रग्जविरोधात काम करत आहे. त्यासाठी केंद्राने इथे येऊन काम करण्याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्याचे काम आहे. छोट्या प्रमाणात ड्रग्ज पकडायचे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जणूकाही फार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत आहेत असे दाखवायचे. मुंबईतली सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवायची आहे यासाठी हे धंदे सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या असतात राजकीय पक्षाच्या नसतात. भाजपाचे लोक केंद्रीय यंत्रणा त्यांच्या नोकर आहेत अशा तऱ्हेने कारभार करत आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एनसीबीने आरोप फेटाळून लावले आहेत असे म्हटल्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “पुरावे आहेत का समोर? चोर स्वतःला चोर असल्याचे सांगत नाही. खोटे पंच, पंचनामे, भाजपाशी संबधित पंच आहेत. त्यातील एकानेच पैशाचे व्यवहार कसे झाले याची माहिती दिली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.