breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचं नाव आता ‘राजगड’,राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला आता राजगड म्हणून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल २६ निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली.

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करुन घेणे, पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – पोलीस पाटील, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ, राज्य सरकारची मोठी घोषणा

राज्याचे विरोधी पक्षनेते असताना २७ एप्रिल २०२३ ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. याचा वेल्हे तालुका, पुणे जिल्हा आणि समस्त महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे, जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

– मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर ( मराठी भाषा विभाग)

– पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार ( गृह विभाग)

– अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता ( सामान्य प्रशासन विभाग)

– केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता ( नगरविकास विभाग)

– श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार ( सार्वजनिक बांधकाम विभाग)

– कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प ( मदत व पुनर्वसन)

– भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज ( वित्त विभाग)

– राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ ( आरोग्य विभाग)

– महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार ( दुग्धविकास विभाग)

– मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार ( जलसंपदा विभाग)

– मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार ( जलसंधारण विभाग)

– शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. ( महिला व बालविकास)

– मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले. (वैद्यकीय शिक्षण)

– आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार. ( कौशल्य विकास)

– कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.( ऊर्जा विभाग)

– शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता ( ऊर्जा विभाग)

– पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)

– पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता ( महसूल विभाग)

– म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन ( वैद्यकीय शिक्षण विभाग)

– आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ ( सार्वजनिक आरोग्य विभाग)

– मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार ( परिवहन विभाग)

– मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता ( नगरविकास विभाग)

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते ( ग्रामविकास विभाग)

– भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

– महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन ( महसूल व वन विभाग)

– जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता ( परिवहन विभाग)

– दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना ( पशुसंवर्धन व दुग्धविकास)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button