महाराष्ट्रातील अनेक शहरांचा पारा घसरला, थंडीची लाट येणार
पुणे : राज्यात मॉन्सून गेल्यानंतर ऑक्टोबर हिट सुरु झाली. ऑक्टोबर हिटमुळे सर्वच शहरातील तापमान वाढले होते. परंतु गेल्या चार दिवसांत राज्यातील वातावरण बदलले आहे. राज्यातील सर्वत्र तापमान २ ते ४ अंश सेल्सियसने घसरले आहे.
पुण्यातील तापमान १०.३ अंशांवर आले आहे. तर विदर्भाच्या काही भागांत तुरळक ठिकाणी थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ही थंडी पुढची ८ दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नागपूर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, महाबळेश्वर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील तापमानात मोठी घट झाली आहे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; उपचारासाठी नकार
हिमालयीन भागासह जम्मू आणि काश्मीर भागात पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वाढला आहे. त्यामुळे या भागात हिमवर्षाव, तर उत्तर भारतात तीव्र थंडी आणि दाट धुके वाढले आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळेच राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे.