मराठा आणि धनगर आरक्षणासाठी ठाकरे गटाचे राष्ट्रपतींना पत्र, विशेष अधिवेशनाची मागणी
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ५ किंवा ६ नोव्हेंबरला भेटीची वेळ मागितली आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू हे शिवसेना उद्धव ठकरे गटाचे नेते भेटीसाठी जाणार आहेत.
हेही वाचा – मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मराठा आंदोलकांकडून तोडफोड
शिवसेना खासदारांनी राष्ट्रपतीना भेटीची वेळ मागितली, खासदार विनायक राऊत यांनी पत्र लिहून महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर आरक्षण विषयाबाबत लक्ष वेधले@HWNewsEnglish pic.twitter.com/1wk1ItRCaM
— Sanjay Jog (@SanjayJog7) November 1, 2023
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. शरद पवार, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.