करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये द्यावे; भाजपा नेत्याची मोठी मागणी
मुंबई |
करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूने थैमान घातलं. दुसरी लाटे शिगेला असताना देशात दिवसाला चार ते साडेचार हजार मृत्यूची नोंद झाली. याच काळात उत्तर प्रदेशात गंगेच्या पात्रात मृतदेह वाहून आल्यानं खळबळ उडाली होती. उत्तर प्रदेशात निर्माण झालेल्या परिस्थिती भाजपाच्या मंत्र्यांसह नेत्यांनीही योगी सरकारवर टीका केली होती. दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीवरून भाजपा नेत्यानं योगी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने पहिल्या लाटेतून काहीच धडा घेतला नाही, असं सुनावत करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख नुकसान भरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम इक्बाल सिंह यांनी केली आहे.
भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या राम इक्बाल सिंह यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेतील अभूतपूर्व परिस्थितीवरून योगी आदित्यनाथ सरकारला सुनावलं आहे. बलियामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सिंह यांनी परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागाने करोनाच्या पहिल्या लाटेतून काहीच धडा घेतला नाही. ज्यामुळे दुसऱ्या लाटेत करोनामुळे प्रचंड मृत्यू झाले, असं सिंह यांनी म्हटलं आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल बोलताना सिंह म्हणाले, “दुसऱ्या लाटेत करोनामुळे प्रत्येक गावात कमीत कमी दहा लोकांचा मृत्यू झाला. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष लोटली, तरी ३४ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात डॉक्टरही उपलब्ध होत नाही आणि औषधीही. करोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
- अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली…
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बलिया जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत समाधान व्यक्त केलं होतं. हा मुद्दा राम इक्बाल सिंह यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यावर बोलताना सिंह म्हणाले,” अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली. त्यांना सत्य परिस्थिती दाखवली नाही,” असं त्यांनी सांगितलं. तसंच सरकारने शेतकऱ्यांना डिझेलवर अनुदान द्यावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.