हैदराबादमध्ये कत्तलीसाठी चाललेले ५८ उंट तळेगाव पोलिसांच्या ताब्यात
अमरावती | अमरावती जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांची वाहतूक व तस्करी होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच गुजरात येथून एका ट्रकमध्ये तब्बल ५८ उंट कोंबून कत्तलीसाठी नेले जात असताना तळेगाव पोलिसांनी या उंटांना जीवनदान देत त्यांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी ५ जणांना तळेगाव दशासर पोलिसांनी अटक केली आहे. या उंटांना सध्या अमरावतीच्या गोयनका यांच्या शेतात ठेवले आहे.
ही कारवाई करताना तळेगाव दशासर पोलिसांना पशुप्रेमी खासदार मेनका गांधी, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे विशेष सहकार्य लाभले. गुजरात राज्यातील कच्छ येथून हैद्राबाद येथे ५८ उंट जात होते. दरम्यान, याची माहिती हैद्राबाद येथील ऍअनिमल वेल्फेयर संघटनेने तळेगाव दशासर पोलिसांना दिली. यावरून तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने निमगव्हाण गावाजवळ ५८ उंट घेऊन जाणाऱ्या ५ व्यक्तींची विचारपूस केली. त्यानंतर या पाचही व्यक्तींना तळेगाव दशासर येथे नेण्यात आले. या आरोपींची नावे रबारी राणा, जग्गा हिरा, विसाभाई रभारी, मुसा जद, विरराणा रबारी अशी असून ते गुजरात भुज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या ५८ उंटांना धामणगाव येथील गोरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आले आहे. याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे ठाणेदार अजय आकरे यांनी सांगितले.