विनेश फोगाटची खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा; म्हणाली..
Vinesh Phogat : भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकून बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह नवे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तर बजरंग पुनिया याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यापाठोपाठ विरेंद्र सिंह यानेदेखील पद्मश्री परत करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता विनेश फोगाटने खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. विनेशने पत्रात म्हटलं आहे की, देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सगळं करण्यास भाग पडलं आहे. हे आम्हाला का करावं लागतंय ते संपूर्ण देशाला माहिती आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात. ही बाब नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्या घरची लेक विनेश फोगाट आहे, मी गेल्या वर्षभरापासून ज्या अवस्थेत आहे, तेच सांगण्यासाठी तुम्हाला पत्र लिहित आहे.
कुस्ती खेळणाऱ्या आपल्या तरुणींनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही भोगलंय. आमचा जीव गुदमरतोय. साक्षीने आता कुस्तीतून संन्यास घेतला आहे. तर आमचं शोषण करणारा सगळ्यांना सांगत फिरतोय की त्याचा कसा दबदबा आहे. त्याने याबाबत उद्धटपणे घोषणाबाजीदेखील केली. मोदीजी, तुम्ही तुमच्या आयुष्यातली केवळ पाच मिनिटं काढून त्या माणसाने गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांसमोर केलेली वक्तव्ये ऐका, तुम्हाला कळेल की त्याने काय केलं आहे. तो महिला कुस्तीपटूंना ‘मंथरा’ म्हणाला. महिला कुस्तीपटूंशी चुकीच्या पद्धतीने वागल्याची कबुली त्याने टीव्ही पत्रकारांसमोर दिली आहे. आम्हाला अपमानित करण्याची एकही संधी त्याने कधी सोडली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे त्याने आतापर्यंत अनेक महिला कुस्तीपटूंना मागे हटण्यास भाग पाडलं. हे खूप क्लेशदायक आहे.
हेही वाचा – मोठा निर्णय! दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्या मिळणार
मैं अपना मेजर ध्यानचंद खेल रत्न और अर्जुन अवार्ड वापस कर रही हूँ।
इस हालत में पहुँचाने के लिए ताकतवर का बहुत बहुत धन्यवाद 🙏 pic.twitter.com/KlhJzDPu9D
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 26, 2023
जे काही घडलं ते विसरण्याचा मी प्रयत्न केला. परंतु, ते तितकं सोपं नाही. मोदीजी मी तुम्हाला भेटले तेव्हा सर्व काही तुमच्या कानावर घातलं होतं. आम्ही वर्षभरापासून रस्त्यावर आंदोलन करतोय. कोणीच आमची दखल घेत नाहीये. आमचे पुरस्कार आणि पदकांची १५ रुपये एवढी किंमत केली जात आहे. परंतु, आम्हाला आमची ती पदकं जिवापाड प्रिय आहेत. आम्ही जेव्हा ती पदकं जिंकली तेव्हा सर्व देशवासियांना आमचा अभिमान वाटला होता. परंतु, आता आमच्या न्यायासाठी आवाज उठवतोय तर आम्हाला देशद्रोही ठरवलं जातंय. बजरंगने कोणत्या परिस्थितीत पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला ते मला माहीत नाही. परंतु, त्याचा तो फोटो पाहून माझी आतल्या आत खूप घुसमट होतेय. त्यामुळे आता मला माझ्या पुरस्कारांचा तिरस्कार वाटू लागला आहे. मला जेव्हा हे पुरस्कार मिळाले तेव्हा माझ्या आईने मिठाई वाटली होती, तसेच माझ्या काकी आणि मावशांना सांगितलं की, विनेशची बातमी टीव्हीवर दाखवणार आहेत, ती बघा. परंतु, आता जर माझी काकी, मावशा टीव्हीवर आमची ही परिस्थिती पाहत असतील तर त्यांना काय वाटत असेल, त्या माझ्या आईला काय म्हणत असतील. याचा विचार करून मला भिती वाटते.
पुरस्कार स्वीकारणाऱ्या विनेशच्या त्या प्रतिमेपासून मला मुक्ती हवी आहे. कारण ते माझं स्वप्न होतं. परंतु, आता आमच्याबरोबर जे काही घडतंय ते सत्य आहे. मला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार दिला होता. परंतु, आता या पुरस्कारांना काहीच अर्थ राहिलेला नाही. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगायचं असतं. त्यामुळे पंतप्रधान मोदीजी मला माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करायचा आहे. जेणेकरून सन्मानाने आयुष्य जगण्याच्या वाटेवर हे पुरस्कार माझ्यावरचं ओझं होऊ नयेत, असं विनेशने पत्रात म्हटलं आहे.