रोहित शर्माने अॅडलेडमध्ये रचला इतिहास, गांगुली-गिलख्रिस्टला टाकलं मागे!

Rohit Sharma : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार अर्धशतक ठोकताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. पर्थ येथील पहिल्या वनडे सामन्यात केवळ ८ धावा करून निराशा पत्करावी लागलेल्या रोहितने अॅडलेडमध्ये दमदार पुनरागमन करत चाहत्यांना उत्साहात न्हाऊन टाकले. त्याने अर्धशतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मेळ
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत संथ झाली. रोहित आणि शुबमन गिल यांनी पहिल्या ६ षटकांत केवळ १७ धावा जोडल्या. मात्र, सातव्या षटकात कर्णधार शुबमन गिल (९) आणि विराट कोहली (शून्य) एकाच षटकात बाद झाल्याने भारत अडचणीत सापडला. यानंतर रोहितने एका बाजूने डाव संभाळत श्रेयस अय्यरसोबत १९व्या षटकात ५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी पूर्ण केली. याच षटकात मिशेल ओवेनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत रोहितने SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) १५० षटकारांचा टप्पा गाठला. असे करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे.
गिलख्रिस्ट, गांगुली यांना टाकले मागे
रोहितने ७३ धावांची खणखणीत खेळी करताना ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. या खेळीदरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सौरव गांगुली आणि अॅडम गिलख्रिस्ट यांना मागे टाकले. पहिली धाव घेताच रोहितने गांगुलीला (९,१४६ धावा) मागे टाकले, तर ५४ धावांवर पोहोचताना गिलक्रिस्टच्या ९,२०० धावांचा विक्रम मोडला. आता रोहित ९,२१९ धावांसह सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर (१५,३१०), सनथ जयसूर्या (१२,७४०) आणि ख्रिस गेल (१०,१७९) आहेत.
हेही वाचा – ‘मोदीज मिशन’ आत्मचरित्र नव्हे, विचारांची गोष्ट… राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या प्रकाशन
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर:
१. सचिन तेंडुलकर – १५,३१०
२. सनथ जयसूर्या – १२,७४०
३. ख्रिस गेल – १०,१७९
४. रोहित शर्मा – ९,२१९
५. अॅडम गिलख्रिस्ट- ९,२००
६. सौरव गांगुली – ९,१४६
भारताने ऑस्ट्रेलियाला दिले २६५ धावांचे लक्ष्य
भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांनंतर हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्या भागीदारीने भारताने ५० षटकांत नऊ गडी बाद २६४ धावा केल्या. भारताकडून रोहितने सर्वाधिक धावा केल्या आणि ७३ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने ६१ धावांची खेळी केली. रोहित आणि श्रेयसमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी झाली.




