#INDvsENG विराट-अश्विन मैदानात; दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात
चेन्नई – भारत विरुद्ध इंग्लडमधील दुसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. मात्र आज तिसऱ्या दिवशी भारताचे भरवशाचे फलंदाज पहिल्या सत्रात झटपट बाद झाले. त्यामुळे भारताची आजची सुरुवात निराशाजनक राहिली. चांगल्या लयीत असलेला चेतेश्वर पुजारा (८) धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) माघारी परतले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (३५) आणि रविचंद्रन अश्विन (३०) यांनी सत्र संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि भारताला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. आता दुसऱ्या सत्राताील खेळाला सुरुवात झाली असून अश्विन आणि विराट मैदानात खेळत आहेत. या दोघांनी भारताचा डाव सावरला आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी इंग्लडची फलंदाजी सुरू असताना सलामीवीर बर्न्स (०), सिबली (१६), लॉरेन्स (९), कर्णधार रूट (६), मोईन अली (६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) सारे स्वस्तात माघारी परतले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, तर नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. तर भारताने दुसऱ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 54 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे 249 धावांची आघाडी आहे.