#INDvsAUS 4th test: भारतासमोर विजयासाठी 328 धावांचे आव्हान
ब्रिस्बेन – बॉर्डर-गावसकर मालिकेतील ब्रिस्बेन येथे सुरु असलेला अखेरचा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाने २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवश्यकता आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफान फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. हॅरिसने ८, तर डेव्हिड वॉर्नरने ६ चौकार लगावले. या जोडीने 89 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र तिसऱ्या दिवसाचे हिरो ठरलेले शार्दुल आणि सुंदर यांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला विकेट मिळवून दिल्या. शार्दुलने हॅरिसला 38 धावांवर बाद केले. मग हॅरिसपाठोपाठ पुढच्याच षटकांत सुंदरने वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. वॉर्नरने ४८ धावांची खेळी केली. तर यानंतर मोहम्मद सिराजने कांगारुंना एकाच षटकात 2 झटके दिले. सिराजने सामन्याच्या 31व्या षटकात मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेडला बाद केले. लाबुशेनने 25 धावा केल्या, तर वेडला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्मिथने सर्वाधिक ५५ धावा काढल्या. मात्र तो मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर कर्णधार रहाणेच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने कॅमरॉन ग्रीनला रोहित शर्माच्या हाती 37 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर शार्दूलनेच ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्याने कर्णधार टीम पेनला क्षेत्ररक्षक पंतच्या हाती झेलबाद केले. पेन 27 धावा करुन परतला. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. चहापानाच्या ब्रेकनंतर पुढील खेळाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र पावसामुळे खेळ थांबविण्यात आला असून ऑस्ट्रेलियाकडे 276 धावांची आघाडी आहे. मुळे टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान मिळाले आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या असून वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट मिळवली.
दरम्यान, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने, तर तुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तर तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.