शेवटच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला संघाच्या बाहेरच बसवण्याचा निर्णय
T20 वर्ल्डकपपासून त्याची बॅट तळपलेली नाही,188 दिवसांत रोहित शर्माची कहाणी पूर्णपणे बदलली

सिडनी : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5वा आणि शेवटचा सामना सिडनीमध्ये सुरू आहे. भारत वि ऑस्ट्रेलियाची मॅच ही क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी असते. मात्र या सामन्यात भारतीय संघात एक मोठा बदल झालेला दिसला, तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा, तो या सामन्यात खेळतच नाहीये, हा सामना रोहितच्या टेस्ट करिअरमधील शेवटचा सामना ठरू सकतो, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र सिडनीमधील मॅचमध्ये तर त्याला खेळण्याची संधीच मिळालेली नाही. त्याचं टेस्ट करिअर संपल्याजतच जमा असून तो कधीही निवृत्तीची घोषणा करू शकतो, असंही आता बोललं जात आहे. म्हणजेच गेल्या 188 दिवसांत रोहित शर्माची कहाणी पूर्णपणे बदलली आहे. अवघ्या 6-7 महिन्यांपूर्वीच, जूनमध्ये भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली टी20 वर्ल्डकप जिंकला होता. पण आता परिस्थिती पूर्ण वेगळी आहे.
188 दिवसांत रोहितचं करिअर कसं झालं उद्ध्वस्त?
भारताचे केवळ काहीच कर्णधार असे आहेत ज्यांनी आयसीसी टूर्नामेंट जिंकल्या आहेत. रोहित शर्मा देखील त्यांच्यापैकीच एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 वर्ल्डकप जिंकला तेव्हा तो संपूर्ण देशाचा हिरो बनला होता. सर्वत्र त्याची चर्चा सुरू होती आणि लहान मोठे सगळेच दिग्गज क्रिकेटरही त्याचे कौतुक करत होते. पण T20 विश्वचषकानंतर त्याचं नशीब पलटल्यासारखं दिसत आहे. T20 वर्ल्डकपपासून त्याची बॅट तळपलेली नाही आणि आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघानेदेखील विशेष कामगिरी केलेली नाही. त्यामुळेच भारतीय संघाचा कर्णधार असूनही आता रोहित शर्माल संघातून वगळण्यात आले आहे.
टी 20 वर्ल्डकप नंतर बॅट तळपलीच नाही
2024 टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने T20I फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने क्रिकेटच्या मैदानातूनही काही काळ ब्रेक घेतला होता. श्रीलंका दौऱ्यातून त्याने पुनरागमन केली. या दौऱ्यात त्याने 3 वनडे मॅच सीरिजमध्ये त्याने 52.33 च्या सरासरीने 157 धावा केल्या, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. यानंतर टीम इंडियाचा कसोटी हंगाम सुरू झाला. मात्र प्रत्येक कसोटी सामन्यात रोहित शर्मा फ्लॉप झाला. T20 वर्ल्डकपनंतर रोहितने बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी, न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 कसोटी सामने खेळले. मात्र या संपूर्ण कालावधीत तो केवळ एकदाच 50 धावांचा टप्पा पार करू शकला.
फक्त बॅटिंगच नव्हे तर कर्णधार म्हणूनही तो अपयशी ठरला. बांग्लादेशविरुद्धचे दोन कसोटी सामने सोडले तर टी-20 वर्ल्डकपनंतर त्याने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. गेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माला एकही सामना जिंकता आलेला नसून अवघा 1 सामान अनिर्णित राखण्यात तो यशस्वी ठरला. न्यूझीलंडने तर टीम इंडियाला घरच्या मैदानातच 3-0 ने पराभत करत सीरिज जिंकली होती, भारतासाठी हा अतिशय लज्जास्पह पराभव होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. मात्र रोहित शर्मा आल्यानंतर भारतीय संघ एकही सामना जिंकू शकलेला नाही. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माला सध्या संघाच्या बाहेरच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.