मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : पृथ्वीमुळे मुंबईचा विजय

उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्यामुळे घालण्यात आलेली आठ महिन्यांची बंदीची शिक्षा भोगून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉ याने रविवारी आणखी एक धडाकेबाज खेळी साकारली. त्याने ३६ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६४ धावा केल्यामुळे मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीमधील ‘ब’ गटात मुंबईने झारखंडचा पाच चेंडू आणि पाच गडी राखून पराभव केला.
मुंबईने नाणेफेक जिंकून झारखंडला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर कुमार देवब्रत (५८) आणि कर्णधार सौरभ तिवारी (२७) यांनी ८५ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यानंतर सुमित कुमारने ३३ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंडने २० षटकांत ५ बाद १७० अशी धावसंख्या उभारली.
मग मुंबईकडून पृथ्वीने आदित्य तरेच्या (२१) साथीने ८२ धावांची दिमाखदार सलामी नोंदवली. मुंबईच्या डावाच्या १२व्या षटकात सोनू सिंगने पृथ्वीचा त्रिफळा उडवला. त्या वेळी मुंबईला विजयासाठी आणखी ७८ धावांची आवश्यकता होती. परंतु शिवम दुबे (११ चेंडूंत २३ धावा), सिद्धेश लाड (१० चेंडूंत नाबाद १८ धावा) आणि सुजित नायक (१२ चेंडूंत नाबाद १७ धावा) यांनी वेगवान धावा करीत मुंबईला जिंकून दिले.
संक्षिप्त धावफलक
झारखंड : २० षटकांत ५ बाद १७० (कुमार देवब्रत ५८, सुमित कुमार ३३; शुभम रांजणे २/१७) पराभूत वि. मुंबई : १९.१ षटकांत ५ बाद १७१ (पृथ्वी शॉ ६४, शिवम दुबे २३; सोनू सिंग २/३४)





