भारताला वेस्ट इंडीजवर 2-0 ने विजय आवश्यक
- विश्वक्रमवारीतील सर्वोच्च स्थान पणाला
दुबई- आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवून कसोटी क्रमवारीत सर्वोच्च स्थान कायम राखण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 1-4 असा पराभव होऊनही भारतीय संघाच्या क्रमवारीत काहीही फरक पडला नव्हता. मात्र, क्रमवारीतील अव्वलस्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडीज विरुद्धची मालिका जिंकणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे असणार आहे.
कसोटी क्रमवारीत सध्या भारतीय संघ 115 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर भारताच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने जर वेस्ट इंडीज विरुद्धची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली, तर भारताच्या गुणांमध्ये वाढ होईल. मात्र, जर भारतीय संघ या मालिकेत 0-2 अशा फरकाने पराभूत झाला, तर भारताची 115 वरून 108 गुणांवर घसरगुंडी होईल आणि त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरण्याची शक्यता आहे.
सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुबई येथे पाकिस्तानविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून जर ऑस्ट्रेलियाने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली, तर त्यांचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहोचेल. जर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली, तर त्यांचे 109 गुण होतील. भारताने वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका 0-2 अशीे गमावल्यास भारताचे 108 गुण होणार असून त्यामुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर जाणार असून ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर विराजमान होईल.