राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार दिल्लीसाठी रवाना
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत ते राजधानीतच असणार आहेत. त्यामुळे यादरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी बोलताना महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, काम करेल आणि नुसतेच पाच वर्षे नाही तर आगामी लोकसभेला व विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करेल, असे सूचक विधान केले होते. विशेष म्हणजे यानंतर शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली होती. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली होती. त्यावरून विविध तर्क वितर्कांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याचे स्पष्ट केले होते. देशात भाजपाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची योजना असून, त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. त्यादृष्टीने आता राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.