मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन, मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय?
Manoj Jarange Patil | मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तीन महत्वाच्या मागण्या सरकारकडे केल्या असून, यातील प्रमुख मागणी म्हणजे सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यात यावे अशी आहे.
मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या काय?
सगेसोयरे कायदा : आजच्या विशेष अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी मनोज जरांगे यांची आहे.
हेही वाचा – अभिनेत्री प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, नंतर मागितली माफी
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : राज्यभरात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
कुणबी नोंदी ग्रामपंचायतवर लावण्याची मागणी : कोणत्या गावात कुणाची नोंद सापडली याची महिती गावकऱ्यांना आणि संबंधित व्यक्तीला मिळावी यासाठी त्या-त्या गावात सापडलेल्या नोंदी त्या गावाच्या ग्रामपंचायतवर लावण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे.