धक्कादायक! अपहरणकर्त्यांशी झटापटीत महिलेचा मृत्यू
पावस |
दुचाकीवरून अपहरण करु पाहणाऱ्याशी झालेल्या झटापटीत महिलेचा त्या गाडीवरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या दिगंबर शिंदे या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. संशयितावर महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा आणि महिलेला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नाखरे-साळवीवाडी येथील रस्त्यावर घडलेल्या या घटनेत मनीषा मंगेश वारीसे (वय ३५) ही महिला मरण पावली आहे.
मनीषा वारीसे या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. माघी चतुर्थीच्या दिवशी काम आटोपून त्या गावातील गणेश मंदिरात उत्सवासाठी गेल्या होत्या. तेथे दर्शन करून परत येत असताना गावातील दिगंबर सुधाकर शिंदे पावसहून मावळंगे येथे जात होता. मनीषा वाटेत भेटल्यानंतर, तुझी आई आजारी आहे, तुला माहेरी नेऊन सोडतो असे सांगून दिगंबरने तिला गाडीवर बसवले. पावस—चावडीवाडी येथे तिचे माहेर आहे.
पण तेथे आल्यावर गाडी न थांबवता त्याने तशीच पुढे नेली. त्यामुळे महिलेला संशय आल्याने नाखरे साळवीवाडी येथे तिने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या दोघांमध्ये झटापट होऊन मनीषा वारीसे रस्त्यावर पडल्या. मात्र त्यांना मदत न करता आपले पितळ उघडे पडण्याच्या भितीने दिगंबर शिंदे याने तिला रस्त्याच्या बाजूला करून ठेवले आणि तो पळून गेला. ही घटना परिसरातील काही लोकांनी पाहिली होती. या दरम्यान मावळंगे येथील प्रदीप थूळ आपल्या कामगारांना घेऊन त्या रस्त्याने जात असताना त्याना महिला रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. त्यांनी याची माहिती पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस तेथे पोचले तेव्हा ती महिला मृत झालेली आढळली. पोलिसांनी सुरवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती.