धक्कादायक! पुण्यात धडाकेबाज पोलिसांसोबत दुजाभाव
गुन्हेगारांना पकडणारे मागेच, प्रामाणिक पोलिसांची थट्टाच…
पुणे । पुण्यात पोलिसांच्या अजब कामगिरीची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत गुन्हेगाराला पकडणं, त्या गुन्ह्याची उकल करणं यासाठी पोलिसांना पुरस्कार आणि पारितोषिकं दिली जातात. पुण्यातसुद्धा असे पुरस्कार देण्याची पद्धत आहे. पण हे पुरस्कार देताना पुणे पोलिसांचा एक अजब कारभार समोर आला आहे. परिमंडळ 3 च्या आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना वेळेत पोलीस आयुक्तालयात बैठकीसाठी नेलं म्हणून चार पोलीस शिपायांना प्रत्येकी 21 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तर दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपायुक्त राजकुमार गाडगे यांनी गुन्हेरीला आळा घालणाऱ्या पोलिसांना 50, 100, 150 ते 250 रुपये अशाप्रकारचं रिवॉर्ड देण्यात आलं आहे. या रिवॉर्डवरुन पोलिसांचं खरं कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा आयुक्तांना वेळेत पोलीस मुख्यालयात बैठकीसाठी आणणं हे काम मोठं आहे का? अशी चर्चा पुणे पोलीस दलात सुरु आहे.
पोलीस अनेकदा जीवाची बाजी लावतात. आपल्या गुप्त सूत्रांना कामाला लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतात. पण पुणे पोलिसात दुजाभाव करत अशाप्रकार देण्यात आलेल्या रिवॉर्डमुळे त्यांच्या कामाची एकप्रकारे ही थट्टा तर नाही ना? असा प्रश्न आता पुणेकर विचारु लागले आहेत.
रिवॉर्डची यादी ही 30 पानांची आहे. उत्तम बंदोबस्तासाठी पोलिसांनी हे रिवॉर्ड दिले आहेत. झोनच्या उपायुक्तांना त्यांच्या क्षेत्रात काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी रिवॉर्ड ठरवण्याचा अधिकार आहे. परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी त्यांच्याकडे ड्रायव्हर आणि इतर कामं करणाऱ्या चार कॉन्स्टेबलला एकाच लिस्टमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 26 रिवॉर्ड दिले आहेत. या 26 रिवॉर्डची किंमत प्रत्येकी एक हजार रुपये अशी आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड दिलेला नाही. फक्त त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना त्यांनी रिवॉर्ड दिला आहे.
पुणे पोलिसांची अजब कामगिरी, गुन्हेगाराला पकडल्याबद्दल 50-250 रुपये अवॉर्ड#Pune #PunePolice
दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 60 रिवॉर्ड दिले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षकापासून ते पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत 50 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड दिले आहेत. पोलीस कर्मचारी जीवावर उधार होऊन मोठ्या धाडसाने गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना पकडून आणतात. पण त्यांची दखल न घेता गाडीने कार्यालयात वेळेवर पोहोचवलं म्हणून एकदा नाही तर तब्बल 26 वेळा रिवॉर्ड दिला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे कर्मचारी यामुळे दुखावले जातात. या प्रकरणाची दखल पुणे पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.