breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात व्यवसायासाठी घेतलेले पैसे आणि सोने परत न दिल्याने केले धक्कादायक कृत्य

पुणे । प्रतिनिधी

व्यवसायासाठी उसने घेतलेले सोने आणि पैसे न दिल्याने एका व्यावसायिकाचे चार ते पाच जणांनी अपहरण केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाच्या पत्नीने तत्काळ फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सांगितलेली माहिती गंभीर असल्याने फरासखाना पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या पाच तासांत पोलिसांनी पुणे ते फलटण दरम्यान आरोपींचा पाठलाग करून व्यावसायिकाची सुटका केली.

या प्रकरणी माया श्रीकृष्ण यमगर (वय २६) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून मयूर माणिक बर्गे (वय २१, रा. फडके हौद) आणि अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ मार्चला सकाळी नऊच्या सुमारास घडला. फरासखाना पोलिसांनी मयूर बर्गे याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, अपहरणासाठी वापरलेली चारचाकी जप्त करण्यासाठी; तसेच अन्य आरोपींना अटक करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपीला २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती श्रीकृष्ण यमगर यांनी व्यावसायवाढीसाठी सराफ बाजारातील व्यापारी आणि बंगाली कारागीर यांच्याकडून उसने सोने आणि पैसे घेतले होते. हे सोने आणि पैसे परत न दिल्याच्या रागातून बर्गे आणि अन्य चार ते पाच जणांनी यमगर यांना त्यांच्या कसबा पेठेतील राहत्या घरातून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने एका कारमध्ये डांबवून ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले, असे तक्रारीत नमूद आहे.

पाठलाग करून केली सुटका

आरोपी श्रीकृष्ण यमगर यांचे अपहरण करून घेऊन गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने मदतीसाठी तातडीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आवश्यक माहिती घेऊन वायरलेसला घटनेची माहिती दिली. यमगर यांच्या मोबाइलचे लोकेशन शोधून त्या मागावर फारसखाना पोलिसांचे पथक रवाना झाले. आरोपी फलटण येथे पोहोचले होते. त्या वेळी फरासखाना पोलिसांनी आरोपींची गाडी अडवली. तेव्हा आरोपींनी व्यावसायिकाला तेथून सोडून पळ काढला. मात्र, एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

आरोपींशी आणखी व्यापाऱ्यांचे संगमनत?

तक्रारदारांचे पती श्रीकृष्ण यमगर यांचा रविवार पेठेत सोने आटणीचा व्यवसाय असून, त्यांनी व्यवसायासाठी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून सोने घेतले होते. वारंवार मागणी करूनही यमगर यांनी हे सोने परत न दिल्याने संबंधित व्यापारी यमगर यांच्यावर चिडले होते. त्यामुळे यमगर यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींशी आणखी व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याची शक्यता असून, त्याबाबत तपास केला जाणार आहे. याशिवाय आरोपींनी अपहरणासाठी वापरलेल्या चारचाकी गाडीला बनावट नंबर प्लेट तयार करून वापरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही बनावट नंबरप्लेट कोठे तयार केली याबाबत आरोपींकडे तपास केला जाणार आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button