शिव ठाकरे राजकारणात प्रवेश करणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिवचे स्पष्टीकरण
राज ठाकरे कायमच मराठी माणसाला शाबासकी देतात
मुंबई : बीग बॉस १६ चा उपविजेता मराठमोळा शिव ठाकरे यांने नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण नेमकं काय याबद्दल शिव ठाकरेने सविस्तर भाष्य केलं आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शिव ठाकरे म्हणाला की, राज ठाकरेंनी मला अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मराठी माणूस पुढे पाऊल टाकतो तेव्हा राज ठाकरे कायमच शाबासकी देतात आणि त्याची त्यावेळी खरंच खूप गरज असते. राज ठाकरेंनी स्वत: बोलावून अभिनंदन केले ही गोष्ट मला खूपच आवडली. त्यांनी स्वत: बोलावून माझी पाठ थोपाटली, असं शिव म्हणाला.
यावेळी शिव ठाकरेला मनसेकडे तुझा अधिक कल आहे का? असं विचारण्यात आले. त्यावर त्याने उत्तर देण्यास टाळले. तो म्हणाला की, माझ्यासाठी माणसं महत्वाची आहेत. राज सर असू दे किंवा कोणत्याही पक्षाचे काही नेते असू दे, हे लोक मी काही नसताना माझ्याबरोबर होते. एखाद्या पक्षापेक्षा ही माणसं खूप महत्वाची आहेत. त्यामुळे आता मला जे काही मिळालं आहे, त्याकाळात मी त्यांना विसरणार नाही. पक्षापेक्षा मी त्या माणसांची माणुसकी पाहतोय, असं शिव म्हणाला.
मला निवडणूक प्रकारापासून दूरच ठेवा. मला या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची हे समजत नाही. मला इतकंच माहिती आहे की, राज सर एक माणूस म्हणून खूप चांगले आहेत. त्यांच्यामध्ये एक कलाकार आहे, ते चित्रकार आहेत अन् चित्रपटांचे कौतुक करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ही भेट एका कलाकाराने एका कलाकाराचे कौतुक करण्यासाठी होती. तर या भेटीकडे अशाच दृष्टीकोनातून पाहिले जावे, असंही शिव ठाकरे म्हणाला.