‘महाराष्ट्राचं राजकीय चित्र वेगानं कसं बदलेल हाच माझा प्रयत्न’; शरद पवारांचं सूचक विधान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती शरद पवार यांना केली. ५ मे रोजी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ते सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.
शरद पवार म्हणाले की, कामाची सुरूवात तर करणारच होतो. माझी कामाची अनेक वर्षाची एक पद्धत आहे. कामाची सुरूवात करण्यासाठी मी दोन पैकी एका ठिकाणाची निवड करतो. एक तर सोलापूर किंवा कोल्हापूर. सोलापूरपासून दौऱ्यावर जावं हा विचार होता. त्यामुळे मी आलो. सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं हे शहर आहे. त्यामुळे मी इथे आलो. मला याचं समाधान आहे.
हेही पाहा – ‘महाराष्ट्रातून तीन महिन्यात ५ हजारांहून अधिक मुली बेपत्ता’; रूपाली चाकणकरांची माहिती
कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटावं त्यांचा उत्साह वाढवावा. पुनश्त हरिओम करावं. वेगाने महाराष्ट्रात चित्र कसं बदलता येईल याची काळजी घेणं हे मी ठरवलंय. बदल घडवून आणायचा असेल तर आम्हाला लक्ष घालावं लागेल. काम करावे लागेल. लोकांच्या सुखदु:खाशी समरस व्हावं लागेल. ते आम्ही करू..काम करावं लागेल..त्याशिवाय चित्र बदलणार नाही, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.