राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षापुर्वी बाबरी मशिद प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला. बाबरी मशिदीच्या ठिकाणी राम मंदीर उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंंतर अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा गैरव्यवहार समोर आला होता. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्यानं देशभर एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालकांकडे खुलासा करण्याची मागणी केली आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय सिंह यांनी सादर केलेले पुरावे धक्कादायक आहेत. अयोध्या हा इतरांसाठी राजकारणाचा भाग असला तरी आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. सामान्य लोकांच्या घराघरातून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात आली आहे. या निधीचा गैरवापर होणार असेल तर श्रद्धेला काही अर्थ राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी थेट सरसंघचालकांकडे खुलास्याची मागणी केल्यानं आता भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.