संजय राऊतांचा गौप्यस्फोट, सरकार 100 टक्के पडणार
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
येत्या दोन महिन्यात राज्यातील राजकारणात काय होईल हे अजिबात सांगता येत नाही असा दावा मंत्री रावसाहेब दानवेंनी केलाय. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. थोडं पण कामाचंराज्यातील गोंधळाची परिस्थिती, दानवेंचा दावाराज्यातील सरकार लवकरच पडणार, राऊतांचा गौप्यस्फोटभाजप शिंदे सरकार पाडणार कि तारणार?
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जवळजवळ 5 महिने पूर्ण होत आहेत. राज्यातील हे सरकार आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही शिंदे गट आणि भाजपकडून केला जात आहे. मात्र, असं असलं तरीही या सरकारमध्ये काहीशी धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की, खुद्द भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच याविषयी भाष्य केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊतांनी दानवेंच्या विधानाचा हवाला देत थेट असा दावा केला आहे की, ‘हे सरकार लवकरच पडणार तशी माझ्याकडे पूर्ण माहितीही आहे.’
रावसाहेब दानवे हे मोकळ्या ढाकळ्या शैलीत बोलणारे नेते अशी त्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांनी पक्ष अडचणीतही आला आहे. बऱ्याचदा त्यांनी वादग्रस्त विधानंही केली आहेत. मात्र, तरीही आपल्या स्वभावाला अजिबात मुरड न घालता दानवे बेधडकपणे विधानं करतात. अशाच स्वरुपाचं विधान त्यांनी नुकतंच केलं आहे. ते असं म्हणाले की, ‘राज्यात गोंधळाचं वातावरण आहे. दोन महिन्यात काय होईल याचा आपण अंदाज लावू शकत नाही.’
आता रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी देखील एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले: ‘दानवेंनी मध्यावधीची त्यांनी संकेत दिले आहेत. रावसाहेब दानवे कधीकधी चुकून खरं बोलून जातात. आमचे चांगले मित्र आहेत. कदाचित त्यांची स्लिप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहेत.’
‘दोन महिन्यानंतर वेगळं चित्र असेल.. एक तर मध्यावधीची घोषणा होऊ शकते. म्हणजेच सरकार पडू शकतं असे त्यांनी संकेत दिले आहेत. ते सरकार 100 टक्के पडतंय याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आहे आणि त्याबाबत खात्रीही आहे.’ असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात सध्या शिंदे गटाच्या जोरावर भाजपचं सरकार अस्तित्वात आहे. मात्र, मागील काही वर्षातील भाजपचं एकूण राजकारण लक्षात घेतलं तर राज्यात संपूर्ण सत्ता मिळविण्यासाठी मोदी-शाह हे एखादा नवा राजकीय डावही टाकू शकतात. आतापर्यंत अनेक राज्यात मोदी-शाह आणि त्यांच्या भाजपने असे प्रयोग देखील केले आहेत.
अशावेळी आपल्या सरकारला काहीही धोका नाही या भ्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला राहता येणार नाही. यामुळे येत्या काळात राज्यातील राजकारण आणखी इंटरेस्टिंग असणार एवढं मात्र नक्की…