TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

संजय राऊत यांचा भाजप – शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई । महाईन्यूज

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलेत. या सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं सीमाभागांत सरकारी प्रेरणेनं जे काही सुरु आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील वाहानांची तोडफोड होत आहे. हल्ले होत आहेत आणि प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करुन तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? आज मी आत्ताच वाचलंय, आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत चाललेत. काय उपयोग आहे त्याचा? त्यांना कळत नाही, काय चाललंय महाराष्ट्राच्यासंदर्भात?”

ज्या सरकारला महाराष्ट्राच्या सीमांचं संरक्षण करता येत नाही. त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आणि मुख्यमंत्री आहेत कुठे यासर्व वादामध्ये, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, हो हे सरकार नामर्दच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचारही घेतला आहे. यासोबतच तीन महिन्यांपासून या सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं केलंय, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

हो नामर्दच सरकार : संजय राऊत
“महाराष्ट्राचे लचके सहजतेनं तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलंय, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर थेट तोफ डागली. अशाप्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधीच आली नव्हती. इतके हतबल मुख्यमंत्री, इतके लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षांत पाहिलेलं नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपुट घातलं, जाणार होतो. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय या राज्यात. डरपोक सरकार! ज्यांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेची काळजी नाही. महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जातायत या राज्यांच्या. ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करुन, बलिदान करुन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कोणी याबाजुला कुरतडतंय, कुणी त्या बाजुनं कुरतडतंय. आणि हे सरकार षंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो नामर्दच सरकार आहे.”, असं संजय राऊत म्हणाले.
सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं केलंय : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, “अशावेळी विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. जेव्हा-जेव्हा असं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, त्यावेळी विरोधी पक्षानं लढाई केलेली आहे. सगळ्या विरोधी पक्षांना आव्हान समोर आलेलं आहे. मुळात तीन महिन्यांपासून या सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं केलेलं आहे. महाराष्ट्राची लूट सुरु आहे आणि ही लूट दिल्लीच्या चरणी अर्पण करावी म्हणून हे सरकार बसवलेलं आहे. आता तर कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो आणि हे स्वतःला भाई समजणारे मुख्यमंत्री, हे भाई आहेत ना? यांना भाई म्हणतात ना? मग भाईगिरी दाखवा ना. महाराष्ट्राच्या बाबतीत. नाहीतर कसले भाई तुम्ही? भाई काय तुम्ही कधी लाठ्या खाल्ल्यात, इतिहास तुमचा असेल तर दाखवा आम्हाला. बेळगावात जाऊन तुम्हाला अटक झाली असेल कधी? लाठ्या खाल्या असतील तर रेकॉर्ड सगळ्यांचे आहेत, आमचेही आहेत. दाखवा महाराष्ट्राला नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटंही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button