मोदी-पवार भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा..
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित होते. मोदी-पवार यांच्या भेटीवरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमाविषयी वाद निर्माण झाले आहेत. पण आम्ही त्यावर पडदा टाकू. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा जेव्हा दिल्लीच्या शत्रूंनी रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक केला. हे पवार साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील.
हेही वाचा – ‘संभाजी भिडेंना असतील तिथून अटक करा’; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
ज्या पद्धतीने पक्ष फोडले, ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण केलं, हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे. जनतेच्या मनात याविषयी रोष आहे. मोदी व्यासपीठावर होते. पण लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या मनातील खदखद कायम आहे. निवडणूक आल्यामुळे प्रत्येक राज्यात पेटवा-पेटवी सुरू होईल. प्रत्येक राज्यात अशा दंगलींना सामोरे जावे लागेल. निवडणुका जवळ आल्यावर भाजपाकडून खेळली जाणारी ही जुनी नीती आहे, असंही संजय राऊत म्हणाले.