‘..तर राम मंदिराच्या उद्घाटनावेळी धर्मांधतेचा आगडोंब उसळेल’; संजय राऊतांचा मोठा दावा
मुंबई : आयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २०२४ पर्यंत या मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी भाजपा सरकारकडून मोठा हल्ला केला जाऊ शकतो, असा मोठा आरोप जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला होता. यालाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय असं म्हटलं जातंय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल, अशी भीती देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटतेय. इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पण आम्ही अत्यंत सावध आहोत.
हेही वाचा – अजित पवारांची पिंपरीत तुफान फटकेबाजी; म्हणाले, मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही..
बाबरी अयोध्येचा मुद्दा संपलेला आहे. हा मुद्दा काढणारा मुर्ख आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा संपवला म्हणूनच तिथे राम मंदिर होतंय. त्याचं श्रेय कोणी घेऊ नये. त्याचं श्रेय घ्यायचं असेल जे हजारो करसेवक मारले गेले त्यांना द्यावं लागेल, त्यात शिवसेनेचा सहभाग आहे, असं संजय राऊत म्हणाले.
सत्यपाल मलिक म्हणाले की पुलवामा झाला नाही केला गेला. गोध्राबाबतही असंच म्हटलं जातं. त्यामुळे २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल, अशी भिती आम्हा सर्वांच्या मनात आहे, असंही संजय राऊत म्हणाले.