‘..तर त्यांनी कमळाबाईच्या दारात गुलामी केली नसती’; संजय राऊतांचा टोला
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. त्यावेळी आधी घोषणाबाजी व नंतर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या सर्व प्रकारावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, काल स्मृतीस्थळावर येऊन ज्या बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, नौटंकी केली, त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला तिलांजली दिली, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला ते शिवसैनिक कसे? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. पण काल ज्यांनी तिथे नौटंकी केली, त्यांना आम्ही कधीच शिवसैनिक मानणार नाही. संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
हेही वाचा – कसब्यातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट, जुने वाडे आणि इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती
जो खरा निष्ठावंत आहे, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे त्यानं विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे. काल जो प्रकार घडला त्यात निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना प्रतिकार केला. कालचा तो ट्रेलर आहे. २०२४ ची ही तयार आहे. काल तिथे आलेल्यांनी आधीच १० वेळा पक्ष सोडलाय. ते आम्हाला काय निष्ठा शिकवतायत? कुणी काँग्रेसमध्ये गेले, कुणी राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेना शिंदे गटात गेले, असं संजय राऊत म्हणाले.
त्यांच्यात श्रद्धा असती तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईच्या दारात गुलामी केली नसती. काल झालं तो ट्रेलर आहे. पुढे बघा काय होतंय, असंही संजय राऊत म्हणाले.