जीवे मारण्याच्या धमक्यावरून सलमान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला,..
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानने आपल्याला मिळालेल्या धमकीवरून प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खानने नुकतेच रजत शर्मा यांच्या आप की अदालत या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तो म्हणाला की, असुरक्षित असण्यापेक्षा सुरक्षा असणं चांगलं आहे. आता मला रस्त्यावर सायकल चालवणं किंवा कुठे एकटं जाणं शक्य नाही. यापेक्षाही जास्त जेव्हा वाहतूक कोंडी झालेली असते तेव्हा इतकी सुरक्षा असते, वाहनांमुळे लोकांना त्रास होत असतो. लोक माझ्याकडे एक कटाक्ष टाकत असतात. गंभीर धमकी असल्यानेच सुरक्षा देण्यात आली आहे.
मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण सुरक्षेत जात आहे. मला माहिती आहे की, कितीही प्रयत्न केला तरी जे काही व्हायचं ते होणार आहे. मला वाटतं देव आहे. याचा अर्थ मी उघडपणे फिरायचं असा नाही. आता माझ्याभोवती इतक्या बंदुका आहेत की कधी कधी मलाच भीती वाटते. जे काही मला सांगितलं जात आहे, त्या सर्व गोष्टी मी करत आहे. किसी का भाई, किसी की जान चित्रपटात एक डायलॉग आहे. तुम्हाला शंभर वेळा भाग्यवान असावं लागतं, पण मला फक्त एकदाच भाग्यवान ठरायचं आहे. त्यामुळे मला फार काळजी घ्यावी लागणार आहे, असं सलमान खान म्हणाला.