राज्यात लाच मागण्यात महसूल विभाग अव्वल; महाराष्ट्र पोलिसांचा नंबर कितवा?
मुंबईः देशभरात करोनामुळं व लॉकडाऊनमुळे लाचखोरी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे. या या वर्षभरात लाचेची मागणी करण्यात महसूल विभाग (revenue department), तर पोलिस विभाग (Maharashtra Police) दुसऱ्या क्रमांकावर आहे. (ACB)
मागील सहा महिन्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३१४ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ७२ अधिकारी हे महसूल विभागातील आहे. तर, पोलिस विभागातील ६७ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर, मुंबई महापालिकाविभागातील १९ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. त्यात २० जिल्हा परिषद, २९ पंचायत समिती, ६ वन विभागाचे अधिकारी, सात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि १३ शिक्षण अधिकारी आहेत.
एसीबीने गेल्या सहा महिन्यात ३१४ प्रकरणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ३०६ प्रकरणं सापळा रचून ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण १४.३ कोटींची लाच मागण्यात आली.
महिन्याभराच्या कमाईपेक्षा अधिक लाच
मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबर सुरेश बामने आणि त्याची पत्नी यांच्यावर १२. ७ कोटी लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच मागितलेली रक्कम ही त्यांच्या पगारापेक्षा १,५००% अधिक आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेतील नितीन पाटणकर यांनाही ३८.३ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही लाच त्यांच्या महिन्याच्या कमाईपेक्षा ४५% अधिक होती.
गेल्या महिन्यात एसीबीने भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला होता. १ जानेवारी २००६ ते ३१ ऑगस्ट २०१५ दरम्यान मेहतांनी उत्पन्नापेक्षा ८.२५ कोटी रुपयांची अधिक संपत्ती गोळा केल्याचं तपासातून समोर आलं आहे.