दंगलमुक्त पुण्यासाठी काढलेल्या ‘शांती मार्च’ला प्रतिसाद
पुणे । महाईन्यूज ।
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने ‘दंगलमुक्त पुणे’ हा संदेश घेऊन ‘शांती मार्च’ काढण्यात आला.लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) ते सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक) या मार्गावर पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे,या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात आला.या शांती मार्चला चांगला प्रतिसाद मिळाला.
संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,उपेंद्र टण्णू,श्रीपाद ललवाणी,कमरुद्दीन शेख,प्रा.एस जी पवार,नीलम पंडित,झंवर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी,महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले.त्यात राष्ट्र सेवा दल,छात्र भारती,भारती विद्यापीठ,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,मामासाहेब मोहोळ महाविद्यालय,अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्था सहभागी झाल्या.प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.गांधीजींची प्रतिमा असलेला चित्ररथ या शांती मार्चच्या अग्रभागी होता.शांतता विषयक विविध संदेश आणि फलक घेऊन तरुणाई या मार्चमध्ये सहभागी झाली.
तत्पूर्वी,गांधीभवन येथे सकाळी आठ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम झाला.गांधी जयंती निमित्त स.१० ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आला.लहान मुलांसाठी जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग दुपारी ४ वाजता झाला.
३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर डॉ उल्हास बापट यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे.७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.
गांधी भवन आवारात खादी,हातमाग आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सचे प्रदर्शन २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते.