#CoronaVirus:राज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात हलवा-आशिष देशमुख
नागपूर : ‘कोरोनामुळे मुंबईतील स्थिती चिंतनाजनक आहे, अशा स्थितीत मुंबईतून राज्याचा कारभार चालवणे अवघड आहे. त्यामुळे राज्य सरकारचं कामकाज नागपुरातून चालवावं, यासाठी राज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करावं’अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 74 लाखांचा धनादेश दिला.
या कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी सरकार नागपुरातून चालवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. नागपुरात कोरोना नियंत्रणात असल्यानं, राज्याचा कारभार नागपुरातून चालवावा, अशी मागणी त्यांनी केली.
आशिष देशमुख म्हणाले, “कोरोनामुळे मुंबईतील स्थिती भयावह आहे. मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून महाराष्ट्र सरकाराचा कारभार चालवू शकणे कठीण आहे. त्यामुळे सरकारचं कामकाज नागपुरातून सुरु व्हावं. नागपूर सुसज्ज आहे, उपराजधानीचं शहर आहे. एकेकाळी नागपूर मध्य प्रदेशाची राजधानी होतं. नागपुरात कोरोना रिकव्हरी रेट चांगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राज्य सरकार नागपुरातून चालवण्यासाठी प्रयत्न करावे. मुंबई असुरक्षित झाल्याने शासन नागपुरातून चालवावं”
नागपूर सुसज्ज आहे. इथे मुख्यमंत्री कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सर्व काही उपलब्ध आहेत. त्यामुळे जे सरकार चालवण्यासाठी आवश्यक आहे ते नागपुरात उपलब्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार नागपूरवरुन चालवण्यासाठी प्रयत्न करावे, असं देशमुख म्हणाले.