भाजपकडून आचारसंहितेचा भंग, आमदार रविंद्र धंगेकरांचा आरोप
पुणे | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक कामांवर आणि उपक्रमांवर बंदी घालण्यात येते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईलाही सामोरे जावे लागते. मात्र, पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. भाजप जाणूनबुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल आहे. जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.
हेही वाचा – धक्कादायक! पोटच्या चिमुकल्या मुलीचा खून करून वडिलांची आत्महत्या, थेरगावात खळबळ
आचारसंहिता काळात कोणत्या कामांवर असते बंदी?
आचारसंहिता काळात सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. कुठल्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी करता येत नाही.सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश काढता येत नाहीत. परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत. धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही. निवडणुकीच्या प्रचार करताना सभा, रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचाऱ्यांचा वापर करण्यास मनाई असते.