‘अजितदादा राहिले नाहीत खुळे, त्यामुळे हारणार आहेत सुप्रिया सुळे’; रामदास आठवलेंची जोरदार फटकेबाजी
पुणे | बारामतीमधून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणातून शरद पवार व सुप्रिया सुळेंवर खोचक शब्दांत टीका केली. तसेच, खास त्यांच्या शैलीतल्या कविता त्यांनी ऐकवताच उपस्थितांममध्ये चांगलाच हशा पिकला.
रामदास आठवले म्हणाले की, एवढंच सांगतो की ‘अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे, अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे… कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला.. अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला. रामदास आठवलेंनी केलेल्या कवितेमुळे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्येही हास्याची लकेर उमटली.
हेही वाचा – ‘ही माझी शेवटची निवडणूक’; शिवाजी आढळराव पाटलांची मतदारांना भावनिक साद
सुनेत्रा पवार यांच्यावर बाहेरची सून म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांना आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून, सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण, असं रामदास आठवले म्हणाले.
सुप्रिया सुळेंबद्दल मला आनंद आहे. त्यांनी लोकसभेत चांगली भाषणं केली आहेत. आता सुनेत्रा पवारांना चांगली भाषणं करू द्या. त्यांना संसदेत जाऊ द्या. अजित पवारांनी सर्वात आधी निर्णय घेतला की सुनेत्रा पवारांना उभं करायचं. तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना उभं करायला नको होतं. ही सून बाहेरची कशी झाली? सुप्रिया सुळेच बाहेरच्या आहेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या सुळे कुटुंबात गेल्या आहेत. सुनेत्रा पवार या पवार कुटुंबात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही. त्या आपल्या सून आहेत, असंही रामदास आठवले म्हणाले.