‘मतपेटीतून राग दाखवल्याशिवाय खड्डे बुजणार नाहीत’; राज ठाकरे
पुणे : महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दैऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या मेळाव्यात रस्त्यांच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी खळ्ळखट्याक आंदोलनं सुरू आहेत. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले, खड्डे काही पहिल्यांदा पडलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे रस्त्यांवर पडत आहेत. मला जनतेचं आश्चर्य वाटतंय. जनता प्रत्येक वेळी त्याच त्याच लोकप्रतिनिधींना निवडून देत आहेत. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीत उतरत नाहीत, तोपर्यंत हे खड्डे बुजणार नाहीत. आजपर्यंत मनसेनं अनेक मुद्द्यांवर अनेक आंदोलनं केली. पदरी काय पडलं? जे महाराष्ट्राचं सर्वार्थाने नुकसान करता, त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून देता? मला याचंच जास्त आश्चर्य वाटतं.
हेही वाचा – ‘ईडी म्हटलं की झोपेतही धावणारे..’; भाजपचा शरद पवारांना खोचक टोला
आमची १६ ठिकाणी आंदोलनं झाली. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक रस्त्यावर आंदोलनं होतील. सर्व ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. यातून सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे, असं ते म्हणाले. ही आंदोलनं खळ्ळखट्याक् पद्धतीनेच होणार का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्यावर प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने करतील.
मी सगळ्यांना सांगितलंय की सगळीकडे तोडफोड करायची गरज नसते. लोकांना त्रास होणार नाही एवढं बघा. कारण रस्त्याने अनेक महिला जात असतात, गर्भवती महिला असतात, ज्येष्ठ नागरिक असतात. पण काही ठिकाणी मनसेचे तरुण कार्यकर्ते आक्रमकपणे उतरणार हे स्वाभाविक आहे. त्याला तुम्ही काही करू शकणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.