पावसाची विश्रांती; आठवडय़ात केवळ हलक्या सरी
पुणे |
कमी दाबाचा पट्टा विरल्याने राज्याच्या बहुतांश भागांत आता सुमारे आठवडाभर पावसाची विश्रांती राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कधी ऊन, तर कधी हलक्या श्रावणधारा बरसतील. पाऊस ओसरल्याने सध्या अनेक भागांत तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडय़ात काही भागांत पाऊस झाला. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पहिल्या टप्प्यात राज्यात जोरदार पाऊस झाला.
तीन दिवसांपूर्वी विदर्भापासून पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. तो उत्तर महाराष्ट्रातून गेल्याने पावसात मागे पडलेल्या नाशिक, धुळे जिल्ह्य़ांत काही प्रमाणात पाऊस होऊ शकला. हा पट्टाही आता विरला असल्याने राज्यात सर्वत्रच पाऊस ओसरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस तरी राज्याच्या कोणत्याही भागात मोठय़ा पावसाची शक्यता नाही. अनेक ठिकाणी सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत असल्याने पाऊस पूर्णपणे विश्रांती घेण्याची शक्यता आहे. ऑगस्टअखेपर्यंत पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. रविवारी मुंबई, जळगाव, अमरावती या ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली. आठवडय़ाभरात कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस विश्रांती घेईल.