ठाकरे सरकार पडणार का नाही ; फडणवीसांनी सभेत सांगितला कार्यकर्त्यासोबतचा संवाद
![Why Thackeray government will not fall; Fadnavis narrated the dialogue with the activist in the meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Why-Thackeray-government-will-not-fall-Fadnavis-narrated-the-dialogue-with-the-activist-in-the-meeting.jpg)
गडचिरोली | राज्यातील ठाकरे सरकार २०२४ च्या आधी पडणार का नाही, हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की, मी तसे केले तर महाविकास आघाडी सरकार आणखी जोरात भ्रष्टाचार सुरु करेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोलीत जनआक्रोश यात्रेच्या व्यासपीठावरून फडणवीस यांनी हे भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका भाजप कार्यकर्त्यासोबत झालेला त्यांचा संवाद जाहीर केला.
मी परवा म्हणालो की, महाराष्ट्रात २०२४ मध्ये भाजप पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करत आहे. त्यानंतर एक कार्यकर्ता मला भेटला. तो म्हणाला की, २०२४ मध्ये आपलं सरकार येईल, हे खरं आहे. पण त्याआधी आपलं सरकार येणार नाही का, असा सवाल त्याने मला विचारला. त्यावर मी म्हटले की, २०२४ च्या आधी भाजपचं सरकार येईल की नाही, हे मी यासाठी सांगत नाही की, एकदा आम्ही सरकार आणतोय, असं म्हटलं की महाविकास आघाडीतील नेते सावध होतील. आपलं सरकार आता जाणार आहे, हे ध्यानात आल्यावर महाविकास आघाडी आणखी जोराने भ्रष्टाचार सुरु करेल. मिळेल ते खाणं सुरु करेल. त्यापेक्षा २०२४ मध्ये सरकार येईल, असं म्हटलेलं बरं आहे. जेणेकरून महाविकास आघाडीतील पक्ष भ्रष्टाचाराची ट्वेन्टी-२० मॅच नव्हे तर टेस्ट मॅच खेळत राहतील. ते जनतेचा थोडाफार तरी विचार करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोलीत सरकारविरोधात मोर्चा
शेतकऱ्यांच्या समस्या, ओबीसी आरक्षण व इतर प्रश्नांवर गडचिरोलीत आज मोर्चा काढण्यात आला. या महाजनआक्रोश मोर्च्यात सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, किसन नागदेवे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष, आमदार देवराव होळी, कृष्णाजी गजबे, राजे अमरीशराव आत्राम, अरविंद पोरेड्डीवार भाजप नेते, बाबुराव कोहळे हे भाजप नेते उपस्थित होते.