हळदीच्या दरात ५०० रुपयांपेक्षा अधिक घट; देशात ४५ लाख पोती शिल्लक
पुणे : हळदीच्या उत्पादनात मोठी वाढ, भुकटीचा वापर होणाऱ्या पूरक उद्योगातील मंदी आणि उत्पादनाच्या तुलनेत निर्यातीत वाढ न होणे आदी कारणांमुळे या उत्पादनाच्या दरात प्रति क्विंटलला ५०० ते १००० रुपयांनी दरात घट झाली. तर, सध्या देशात हळदीची ४५ लाख पोती (एक पोते ५० किलो) शिल्लक आहेत. भविष्यातही दरात फारशी तेजी येण्याची शक्यता नाही, असा अंदाज जाणकारांचा आहे.
यंदा मराठवाडय़ातील विक्रमी लागवडीसह देशात हळदीची सुमारे २ लाख ४४ हेक्टरवर लागवड झाली होती; पण पाऊस जास्त झाल्यामुळे उत्पादनात घट होऊन सरासरी ८० लाख पोती उत्पादन झाले होते. दोन वर्षांपासून देशात या उत्पादनात वाढ होत आहे. शिवाय दरवर्षी देशभरात सुमारे २५ लाख पोती शिल्लक असतात. त्यामुळे बाजारात १ कोटी १० लाख पोती विक्रीसाठी उपलब्ध असतात.
दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
यंदा देशांतर्गत पूरक उद्योगात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे हळदीचा वापर कमी झाला आहे. सध्या देशात या उत्पादनाची ४५ लाख पोती शिल्लक आहेत. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला दरात ५०० ते ८०० रुपयांनी तेजी होती. जून महिन्यात देखील दर टिकून होते; पण आता काही प्रमाणात मंदी आहे. देशात दररोज चार ते पाच लाख पोती विक्री होत असली, तरी बाजारात फारसा उठाव नाही.
दिवाळीनंतर विक्रीस गती?
दिवाळीनंतर हळदीच्या विक्रीत वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत २० ते २५ लाख पोत्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. तरीही यंदाच्या हंगामात सुमारे २० ते २५ लाख पोती हळद शिल्लक राहतील. या दरम्यान हळदीच्या दरात तेजी-मंदी होण्याची शक्यताही नाही. दर स्थिर राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
उत्पादनाचा अंदाज का चुकतो?
देशात हळदीची लागवड २ लाख ७५ हजार हेक्टरवर झाली होती. गेल्या काही वर्षांत हवामानात वेगाने बदल होत आहे. अति पाऊस, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्या भागात हळदीच्या पिकाचे नुकसान झाले, कोणत्या भागात पीक चांगले आहे, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान देशातील या पिकाचे क्षेत्र आणि पिकाची परिस्थिती समोर येईल. त्या वेळी उत्पादन घटेल की वाढेल, याचा अंदाज लावणे शक्य आहे.
हळदीचा वापर होणाऱ्या पूरक उद्योगात मंदीचे वातावरण आल्याने तिच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. तसेच देशात या पिकाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. याचा परिणाम दरावर होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा निर्यातीत वाढ झाली असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
– मनोहर सारडा, हळदीचे व्यापारी, सांगली