मातोश्रीत बसलेल्या ‘मर्दांनी’ पोलिसांना फक्त २४ तास रजेवर पाठवावं; नितेश राणेंचं शिवसेनेला आव्हान
![The 'men' sitting on the mat should send the police on leave for only 24 hours; Nitesh Rane's challenge to Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/The-men-sitting-o.jpg)
सिंधुदूर्ग | खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाल्यानंतर आता राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. अशात किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपने याचा जोरदार निषेध केला आहे. यावरच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत करत ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
‘जर दररोज भाजप सरकारच्या नेत्यांवर ठाकरे सरकारच्या गुंडांकडून पोलीस संरक्षणात हल्ला केला जात असेल. याला शौर्य म्हणत असतील तर मातोश्रीवर बसलेल्या सो-कॉल्ड ‘मर्दां’नी पोलिसांना फक्त २४ तासांसाठी रजेवर जाण्यास सांगा. हे सर्व थांबेल याची खात्री करू’ अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला हे चॅलेंज केलं आहे.
खरंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना काल अटक करण्यात आली. त्यांना भेटण्यासाठी जात असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला करण्यात आला. या संदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही यांनीही संताप व्यक्त केला आहे.
नारायण राणेंकडूनही निषेध
दरम्यान, या प्रकरणात नेते नारायण राणे यांनीही सरकारवर घणाघाती टीका करत या घटनेचा निषेध केला आहे. ते ट्वीट करत म्हणाले की, ‘भाजप नेते श्रीयुत किरीट सोमय्या जी यांच्यावर खार पोलीस स्टेशनच्या आवारात ६० ते ७० शिवसैनिकांनी पोलिसांच्या उपस्थितीत केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. पोलिसांच्या मदतीने एका व्यक्तीवर ६० ते ७० लोकांनी हल्ला करणे याला पुरुषार्थ म्हणत नाहीत, हा भ्याड हल्ला आहे.’