प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात, आठवड्याभरात राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार
![The final draft of the ward structure will be submitted to the State Election Commission within a week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/pcmc-1-1.jpg)
पुणे – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती मागविल्या जातील. त्यावर सचिव दर्जाच्या अधिका-याच्या उपस्थित सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे.
राज्य शासनाने तीन सदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच निवडणूक विभागाच्या कामाला गती आली आहे. शहरात तळवडे गावठाणापासून नव्याने प्रभाग तयार करण्यास सुरुवात झाली. तर, सांगवीत प्रभाग रचनेचा शेवट झाला होणार आहे. महापालिकेच्या निवडणूक विभगाने प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी 25 सदस्यांची समिती तयार केली. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती प्रारुप आराखड्याचे काम करत आहे. अगामी महापालिका निवडणूक 2011 च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे.
शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यापैकी 13 लाख 50 हजार मतदार आहेत. मतदारनोंदणी सुरु असून 14 लाखापर्यंत मतदारसंख्या होऊ शकते. नगरसेवकांची संख्या 128 च राहणार आहे. शहरात 3102 ब्लॉक आहेत. एका ब्लॉकमध्ये 400 ते 800 लोकसंख्या राहणार असून 150 घरांची मर्यादा आहे. 36 ते 44 हजार दरम्यान लोकसंख्येचा एक प्रभाग होणार आहे. दरम्यान, या सर्व गोष्टींचा विचार करून निवडणूक विभाग प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ दिवसांत प्रारुप आराखडा पूर्ण होऊन तो राज्य निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
कच्चा आराखड्यावर हरकती मागविणार
प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगासमोर सादर केल्यानंतर त्यावर हरकती मागविल्या जातील. हरकतींवर सचिव दर्जाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत सुनावणी घेतली जाईल. प्रारुप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाईल. त्यांतर आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणूक विभागाकडून दरम्यानच्या काळात आरक्षण सोडत होईल.