शहरात कचरा जाळण्याचे प्रमाण लक्षणीय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Amol-Kolhe-30-780x470.jpg)
पुणे : शहरातील हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर कचरा साठणाऱ्या ठिकाणांवरच (क्राॅनिक स्पाॅट) कचरा पेटवला जात आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत असून, याबाबत असलेली महापालिकेची तक्रार निवारण प्रणाली कुचकामी ठरत आहे.
शहरात जाळण्यात येत असलेल्या कचऱ्याबाबत “परिसर’ संस्थेच्या वतीने पुणे एअर अॅक्शन हब’ या गटाने १५ प्रभागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. महापालिकेने याबाबत तातडीने पावले उचलण्याची सूचना याद्वारे करण्यात आली आहे. या गटाकडून आॅक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण केले होते.
याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. या अभ्यासातून पुण्यामध्ये कचरा जाळण्याच्या घटना सर्रास घडत असल्याची, तसेच हे प्रकार वारंवार होत असलेल्या ठिकाणांची माहिती नारिकांनी दिली. या समस्येची जाणीव नागरिकांना असली तरी तक्रार प्रक्रियेची माहिती नसल्याचेही या सर्वेक्षणात समोर आले आहे.
हेही वाचा – ‘ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडणार? निम्मे आमदार आमच्या संपर्कात…’; गुलाबराव पाटील यांच्या दाव्यानं खळबळ
नागरिक तसेच व्यावसायिकांनी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून द्यावे, यासाठी सर्व कचराकुंड्या महापालिकेने बंद केलेल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक भागांत दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून, असे उकिरडे (क्राॅनिक स्पाॅट) तयार झाले आहेत. या सर्वेक्षणात ७५ टक्के नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या उकिड्यांच्या ठिकाणी वारंवार कचरा जाळला जातो.
तर, हा प्रकार दररोज घडत असल्याचे ३३ टक्के नागारिकांनी सांगितले. आठवडयातून दोन ते तीन वेळा हे प्रकार दिसत असल्याचे ४२ टक्के नागरिकांंनी सांगितले आहे. तर २५ टक्के नागरिकांनी याबाबत पालिकेकडे तक्रारही केल्याचे सांगितले.
नागरिकांनी महापालिकेकडे नोंदविलेल्या तक्रारींचा अभ्यास केला असता ७५ टक्के तक्रारी दाखल झाल्यापासून दोन दिवसांनंतर निकाली काढण्यात आल्या. तर एकाही तक्रारीत दंडात्मक कारवाई झालेली नाही. तर टोकन क्रमांकानुसार तक्रारींची स्थिती तपासली असता, तक्रारी वारंवार पुढे पाठवल्याचे दिसते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यापर्यंत तक्रार पोहोचेपर्यंत बराच वेळ वाया गेला आहे.
“हडपसर, मुंढवा, औंध, बाणेर, वानवडी, रामटेकडी या काही वॉर्डांमध्ये अशा अधिक घटना होत असल्याचे आढळले. परंतु कचरा जाळण्याचे प्रकार पाहणाऱ्या, माहिती असणाऱ्या नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत असला, तरी केवळ २० नागरिकांनी तक्रार नोंदवली होती, असे दिसून आले.”
– श्वेता वेर्णेकर, सदस्य, पुणे एअर अॅक्शन हब