“भारत छोडो” आंदोलनाच्या स्मरणार्थ विद्यानिकेतन स्कूलची भव्य रॅली
संग्राम दुर्गावर देशभक्तीचा जल्लोष
चाकण : विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे “भारत छोडो” आंदोलनाच्या स्मरणार्थ क्रांती दिनाच्या निमित्ताने भव्य देशभक्तीपर रॅली व संग्राम दुर्गावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८.३० वाजता शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी तिरंगा, देशभक्तीपर तक्ते व घोषवाक्यांसह “वंदे मातरम”, “भारत माता की जय” अशा घोषणा देत परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, शिवराम राजगुरू यांसह क्रांतीवीरांच्या वेशभूषा रॅलीचे आकर्षण ठरल्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी. देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामराव देशमुख, सचिव डॉ. रोहिणीताई देशमुख, मुकेश कोळी, विठ्ठल साळुंखे, मेघना देशमुख, तसेच प्राचार्य दीपक शिंदे, प्राचार्या रैना मून, प्राचार्या नीलम सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या सत्कारानंतर सोमनाथ हतुरे यांनी उपस्थितांना देशभक्ती व राष्ट्रसेवेची प्रतिज्ञा दिली.
विद्यार्थिनी देशना छाजेड, स्वरा मदोळे, संस्कार वाघिरे यांनी प्रभावी भाषणांद्वारे क्रांती दिनाचा ऐतिहासिक वारसा उलगडला. गणित शिक्षिका नम्रता झोपे, प्राचार्या नीलम सिंग व अध्यक्ष श्यामराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना कर्तव्य, सामाजिक ऐक्य व परिवर्तनाचा संदेश दिला.
हेही वाचा : जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!
इयत्ता २री ते ५वीच्या विद्यार्थ्यांनी “ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध मंगल पांडे यांचा उठाव” या विषयावरील नाटिका सादर केली, ज्यात देशभक्ती, शौर्य व बलिदानाचे प्रभावी चित्रण झाले. यावेळी नृत्यदिग्दर्शन आशिया शेख यांनी केले. सहावी-सातवीच्या विद्यार्थिनींनी पाहुण्यांना राखी बांधून बंधुत्वाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गांडेकर व स्नेहल ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऋतुजा टेंगले यांनी केले. “वंदे मातरम”च्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा केवळ देशभक्तीचा नव्हे तर एकतेचा व सामाजिक बंधांचा अनोखा संदेश देणारा ठरला.





