तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिरिजू यांचे मत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-23-3-780x470.jpg)
पुणे : “देशातील जवळपास २५ टक्के लोकसंख्या तरुणांची आहे. मात्र, या तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक आहे,’ असे मत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिरिजू यांनी व्यक्त केले.
केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे “विकसित भारत’ अभियानाअंतर्गत शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात झालेल्या “युवा कनेक्ट’ कार्यक्रमात रिजिजू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे तसेच प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. शामकांत देशमुख व प्रा. निवेदिता एकबोटे या वेळी उपस्थित होते.
रिजिजू म्हणाले, “विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (स्टेम) या क्षेत्रावर किती भर दिला जातो त्यावर देशाचा विकास अवलंबून आहे. सेमी कंडक्टर क्षेत्रात भारताने संधी गमावली होती. मात्र, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संधी गमावून चालणार नाही.
हेही वाचा – Breaking News: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेचा मृत्यु; पोलिसांनी केला ‘एन्काऊंटर’
संशोधनावर भर दिल्यासच वेगाने विकास शक्य आहे. आता देशातील कोणीही गरीब नसेल, देश दुसऱ्या देशावर अवलंबून नसेल, देशातील प्रत्येकजण आनंदी असेल, तेव्हा भारत विकसित होईल. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करणार आहे.तोपर्यंत भारत विकसित देश झाला पाहिजे. ७५ वर्षांत जे होऊ शकले नाही, तर पुढील २२ वर्षांत साध्य करायचे आहे.
विकसित भारतासाठी तरुणांनी त्यांना जे योग्य वाटते ते करावे. राजकारणी करतात ते राजकारण असा गैरसमज आहे. पण, राजकारण सगळीकडे आहे. खेळातही राजकारण आहेच. उद्योग क्षेत्रातील राजकारणाची तर कल्पनाही करता येणार नाही.
शिक्षण क्षेत्रात, प्राध्यापकांमध्येही राजकारण होते. तरुणांना निवडणुकीच्या राजकारणात उतरायचे असल्यास स्वागतच आहे. सरकारी योजना, उपक्रमांपासून दूर राहू नका, ते तुमच्यासाठीच आहेत, असेही किरेन रिरिजू यांनी सांगितले