अर्धवट कामांचे उद्घाटन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या परतीसाठी प्रयत्न करा, शरद पवारांचे मोदींना सल्ला
पुणे | युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या मुद्द्यावरु न आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केली. पुण्यातील मेट्रोच्या अर्धवट कामांच्या उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनवरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले की, रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम युक्रेनमधील अडकलेल्या विद्यार्थ्यांवर होतोय. मी काही विद्यार्थ्यांशी बोललो. युक्रेनमध्ये कमी फीमध्ये मेडिकलसाठी प्रवेश मिळतो. इथे 95 टक्के मार्क पडून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे 60 टक्क्यांना प्रवेश मिळतो. पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांचे उद्घाटन करण्यापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे. लिबीयातून त्या वेळी भारतीयांना परत आणण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, ती सगळ्यांना माहित आहे. संघर्षामध्ये आपण कोणाची बाजू घेत नाही. त्यामुळे भारत सरकारच्या याबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेबाबत टिका टिपणी करण्याची ही वेळ नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
पुणे मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या हस्ते पुण्यात नदी सुधार प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाला प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत शरद पवार म्हणाले की, मी काही इंजीनिअर नाही. पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत असून त्याच्या वरसगाव आहे. उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत. पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार असल्याचे शरद पवार म्हणाले