‘युपीएच्या अध्यक्षपदाची जागा खाली असती तर…’; सुशीलकुमार शिंदेंचे मोठे विधान
पुणे |मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाविरोधात भूमिका घेतली आणि त्या भोंग्याचा आवाजाच्या दुपटीने हनुमान चालीसा लावावी असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावरून आता काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंना चांगलंच फटकारलं आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
“कोणीही जातीयतेचा प्रश्न घेऊन हाताळत असेल तर या देशाच्या दृष्टीने ते योग्य नाही. जाती-धर्माचे राजकारण या देशामध्ये चालत नाही, त्यामुळे या असल्या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही” असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
सुशीलकुमार शिंदेंनी सुजात आंबेडकरांना सुनावलं…
दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. या विधानाचादेखील सुशीलकुमार शिंदेंनी समाचार घेतला आहे. “एका जातीला दोष देण्याचा काही कारण नाही. ब्राह्मण, दलित, मराठा कोणीही असो सर्वांनी सर्वधर्मसमभावाची पूजा केली पाहिजे”. असं शिंदे म्हणाले आहेत.
तर, युपीएच्या अध्यक्षपदाबाबत देखील सुशीलकुमार शिंदेंनी भाष्य केलं आहे. शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करावे अशी काही लोकांची इच्छा आहे. असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांना विचारला ते म्हणाले, यूपीए अध्यक्षपदाची जागाच खाली नाही, जागा खाली असती तर गोष्ट निराळी होती.
आता तरी ‘ते’ सुधारतील
सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि घसरत चालेल्या राजकारणाच्या स्थरावर सुशीलकुमार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही जो काळा अनुभवला आहे त्यात काही परंपरा, काही संकल्पना, काही संकेत पाळून सगळं बोलत होतो. आज मला वाटतं ते कमी झालेले आहे. आता तरी या सगळ्यामधून हे लोक सुधारतील अशी माझी अपेक्षा आहे”. असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.