शाळा-रुग्णालयांबाहेर जंक फूड बंद

मुंबई – नव्या फेरीवाला धोरणानुसार शैक्षणिक संस्था आणि 100 खाटांपेक्षा जास्त क्षमतेच्या रुग्णालयांबाहेर चणे, शेंगदाणे, फळे आणि नारळ पाण्याव्यतिरिक्त कोणतेही खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत. तसा निर्णय महापालिकेने फेरीवाला धोरणांतर्गत घेतला असून, त्यामुळे 100 मीटर परिसरातील जंक फूड, वडापाव आदी पदार्थ विकणाऱ्या खाऊगल्ल्या बंद होणार आहेत.
शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांच्या परिसरात 100 मीटरपर्यंत ना फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, आवश्यकतेनुसार परिसरात काही वस्तू विकण्याची सूट महापालिकेने दिली आहे. त्यात, 250 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात शैक्षणिक साहित्य, बाटलीबंद पाणी, भाजलेले चणे-शेंगदाणे, शहाळी आदी खाद्यवस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशीच परवानगी 100 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांच्या परिसरात देण्यात आली आहे. परिसरात शैक्षणिक साहित्य वगळता शहाळी, फळे आणि चणे-शेंगदाणे विकण्यास परवानगी असेल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांबाहेर मोठ्या प्रमाणात खाऊगल्ल्या असतात. खासकरून, महापालिका आणि सरकारी रुग्णालयांबाहेर सर्रास खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. मात्र, फेरीवाला धोरण लागू झाल्यानंतर 100 मीटरच्या परिसरातील खाऊगल्ल्या बंद होणार आहेत.





