विषारी वायू गळती दुर्घटनेमध्ये एका अधिकाऱ्याचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/sanjay-dhavale-7_201905234316.jpg)
बारामती – बारामती व पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील नीरा – निंबूत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी मध्ये १७ एप्रिल २०१९ रोजी वायू गळतीची घटना घडली होती. त्यात ४८ कामगार बाधित झाले होते. त्यामध्ये अत्यवस्थ असलेल्या संजय जगन्नाथ ढवळे या अधिका-याचा मंगळवारी (दि.७) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना नीरा व परिसरात वा-यासारखी पसरल्यामुळे नागरिकांमध्य भयावह वातावरण पसरले आहे.
नीरा नदीच्या काठावरील निंबुत – नीरा येथील घातक रसायन उत्पादन करणाऱ्या ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीत १७ एप्रिल २०१९ रोजी अॅसीटिक अनहायड्राईड या टाकीतून विषारी वायू गळतीमुळे लोकांना डोळ्यात व फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात वेदना झाल्याने सुमारे ४८ कामगार बाधित झाले होते. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या काही कामगारांना पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी संजय जगन्नाथ ढवळे (वय- ५६) या अत्यवस्थ अधिका-याचा मंगळवारी (दि.७) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारा दरम्यान मुर्त्यु झाला.
ढवळे हे ज्युबिलंट कंपनीत लाजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये सिनियर एक्झिक्युटीव्ह म्हणून कार्यरत होते. हल्ली ते ज्युबिलंट कंपनीच्या कॉलनीमध्ये राहत होते. ढवळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असून त्यापैकी एक विवाहित मुलगी, दोन भाऊ आहेत. लोणंद (ता. खंडाळा) या ढवळे यांच्या मूळ गावी त्यांच्यावर बुधवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला.
दरम्यान , ज्युबिलंट कंपनीमध्ये वायुगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले असून कंपनीने उत्पादन चालू ठेवले आहे कि नाही हे समजू शकले नाही. तसेच ज्युबिलंट कंपनीच्या दुर्घटनेमुळे अजूनही कंपनी परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे. घातक रसायने निर्माण करणा-या ज्युबिलंट कंपनीच्या विरोधात वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. या आंदोलकांनी मागील दोन दिवसांपासून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. आंदोलकांचा न्यायालीन लढा सुरू असुन पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
…..
मानवी जीवास घातक रसायने भर लोकवस्तीत निर्माण केली जात आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता फॅक्टरी इन्स्पेक्टर यांचा अहवाल आल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र, हा प्लैंट आजही सुरू असल्याने संताप व्यक्त करुन निषेध व्यक्त करत आहोत. हे युनिट त्वरीत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
– सचिन मोरे , नीरा नदी संघर्ष समिती, अध्यक्ष